Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 November 2020 Time 07.10 to 07.25 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१० ****
· प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
· कोविड-19 च्या लसनिर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान आज पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटसह देशातल्या तीन प्रयोगशाळांना भेट देणार.
· मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश.
· राज्यात आणखी सहा हजार १८५ कोविडग्रस्त; मराठवाड्यात पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू तर नवे ४४३ रुग्ण.
· बीड जिल्ह्यात ११ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; चार दिवसांतली दुसरी घटना.
· औरंगाबाद जिल्ह्यातली पर्यटन स्थळं उघडण्याच्या मागणीसाठी ऑनलाईन आंदोलन.
आणि
· पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६६ धावांनी विजय.
****
राज्यात प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला. सरकारनं ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आता ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. हिवाळ्यात कोविड प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा धोका असल्यानं, हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोविड-19 च्या लसनिर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या तीन प्रयोगशाळांना भेट देणार आहेत. यामध्ये अहमदाबाद इथली जायड्स बायोटेक पार्क, हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थांचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयानं एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली.
दरम्यान, वायू दलाच्या विशेष विमानाने पंतप्रधान आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल होतील. तिथून ते हेलिकॉप्टरने दुपारी एक वाजेच्या सुमारास मांजरी इथल्या सीरम इन्स्टिट्यूट परिसरात पोहोचतील. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह तिथले शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी लसनिर्मितीतली प्रगती, आव्हानं आणि इतर बाबीसंदर्भात पंतप्रधान संवाद साधणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोव्हिशील्ड ही लस विकसित होत आहे.
दरम्यान, येत्या ४ डिसेंबरला १०० देशांच्या राजदुतांचा सीरम कंपनीचा दौरा रद्द झाला आहे.
****
रशियाने कोविडवर विकसित केलेल्या स्पुटनिक-व्ही या लसीचं उत्पादन भारतात होणार आहे. यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि हैदराबाद इथल्या हेटेरो बायोफार्मा कंपनीसोबत करार झाला आहे. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे दरवर्षी १० कोटी डोसचं उत्पादन करतील, अशी माहिती रशियन कंपनीनं दिली आहे.
****
कोविड काळात खऱ्या अर्थाने कोरोना योध्दे म्हणून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल जळगाव इथं महिला आणि बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि बाल विकास भवन उभारण्यात येणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याची सूचना करत, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून यासाठी ३ टक्के निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून सुमारे २७ घटकांना प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबरला संपणार होती, ती ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
*****
कोविड प्रादुर्भावामुळे गेल्या ९ महिन्यांपासून खंड पडलेला लोकशाही दिन उपक्रम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. नागरिकांच्या विविध समस्यांची स्थानिक स्तरावरच सोडवणूक करण्याच्या उद्देशानं दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जात असे, कोविड प्रादुर्भावामुळे हा उपक्रम बंद पडला होता. आता हा उपक्रम पुन्हा सुरू करताना, नागरिकांच्या तक्रारी व्हर्च्युअल पद्धतीने घ्याव्यात, तक्रारींचं जागेवरच निराकरण करावं, संसर्गाचं कारण देऊन उपक्रम टाळू नये, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोविड प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केलं आहे.
****
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई सूडबुद्धीनं केल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काल या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नुकसानाच्या मूल्यांकनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले असून, नुकसान भरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च २०२१ पर्यंत सादर करण्याचे तसंच यापुढे कारवाई करण्यापूर्वी महापालिकेनं ७ दिवसांची नोटीस द्यावी, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्याची परवानगीही न्यायालयानं दिली आहे.
****
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वर्षपूर्तीनिमित्त बोलतांना, देशाच्या पातळीवर केंद्रित लोकशाहीची कोंडी फोडण्याची आश्वासक कलाटणी, तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारने दिली असून, देशातले अनेक पक्ष, अनेक नेते या नवीन समीकरणाकडे आशेने बघत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संवेनशीलता, लोकांशी संवाद साधण्याची शैली तसंच व्यवस्थापनाची पद्धत, सरकारच्या कामकाजातही प्रभावी ठरत असल्याचं गोऱ्हे यांनी नमूद केलं.
दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांनी वर्षपूर्ती करणारं राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं पत्रकारांशी बोलत होते. गेल्या वर्षभरात राज्य सरकारनं सामान्य जनतेचे कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत, सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई, हे सरकार अजूनही देऊ शकलेलं नाही, अशी टीका राणे यांनी केली.
****
मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ४३ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. राज्यात मराठी, हिंदीसह इतर भाषांमधले चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांसह जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राचे एक धोरण असणं, ही काळाची गरज बनली असल्याचं देशमुख म्हणाले.
****
राज्यात काल आणखी सहा हजार १८५ कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख आठ हजार ८५० झाली आहे. काल ८५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४६ हजार ८९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल चार हजार ८९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या राज्यात ८७ हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४४३ रुग्णांची नोंद झाली.
जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात १५०, लातूर जिल्ह्यात ९३, नांदेड ६८, बीड ५६, जालना ३०, उस्मानाबाद २१, हिंगोली १६ तर परभणी जिल्ह्यात नव्या नऊ रुग्णांची नोंद झाली.
****
कोविड लसीकरणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या खासगी रुग्णालयांनी सर्व डॉक्टर, परिचारिका तसंच इतर कर्मचाऱ्यांची माहिती तत्काळ द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे. कोविड-19 लसीकरण तयारीच्या अनुषंगाने काल जिल्हा कार्यदल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्यात सर्व शासकीय तसंच खासगी रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार, वॉर्डबॉय तसंच रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. नागरिकांनीही डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही माह��ती देण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल सचखंड एक्सप्रेसनं आलेल्या २१७ प्रवाशांची रेल्वे स्थानकावर RTPCR चाचणी करण्यात आली. तर विमानतळावर ४९ प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अटी आणि शर्तीच्या अधीन राहून शुभकार्यात बँड वाजवण्याची परवानगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. बँड पथकातल्या सर्व सदस्यांना कोविड प्रतिबंधाच्या सर्व निर्देशांचं पालन बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात काल एका ११ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. काल दुपारी किन्ही इथं नातेवाईकांसोबत शेतात जाणाऱ्या स्वराज भापकर या मुलावर बिबट्याने झडप घालून त्याला ओढत दूर नेलं, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वराजचा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातली आठवडाभरातली ही दुसरी घटना आहे. मंगळवारी पाटसरा इथं एका शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
****
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातून बालकाचं अपहरण करणाऱ्या चार आरोपींना लातूर पोलिसांनी अटक केली आहे. रेणापूर तालुक्यात सांगवी इथं किराणा व्यापारी देविदास सांवत यांच्या पाच वर्षाच्या मुलाचं आरोपींनी ११ सप्टेंबर रोजी अपहरण केलं होतं, मात्र आरोपींच्या नातेवाईकांनी या मुलास ठेवून घेण्यास नकार दिल्यानं, आरोपींनी या बालकाला लातूर तालुक्यात चाटा या गावी सोडून दिलं होतं. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल तब्बल ७० दिवसांनंतर चौघा आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह अटक केली. केरबा उर्फ लक्ष्मण मुदाळे, मारोती लक्ष्मण मुदाळे, दीपक राम मुदाळे आणि गजानन लक्ष्मण सावंत अशी या चौघांची नावं आहेत. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी तपास कामात सहभागी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातली पर्यटन स्थळं उघडण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनसह विविध दहा संघटनांनी काल ऑनलाईन पद्धतीनं निषेध नोंदवला. या संघटनांच्या प्रतिनिधींनी सामाजिक संपर्क माध्यमांवर दृकश्राव्य फिती अपलोड करुन अजिंठा वेरुळसह जिल्हाभरातली पर्यटन स्थळं उघडण्याबाबत सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी केली. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राज्यात कोकणातले समुद्रकिनारे, मुंबईतल्या घारापुरी लेण्या, तसंच विविध गड किल्ल्यांवर पर्यटन सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातली पर्यटन स्थळं मात्र बंद आहेत, याकडे त्यांनी यांनी लक्ष वेधलं
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा ६६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत यजमान संघानं भारतीय संघासमोर ३७५ धावांचं लक्ष्य ठेवलं, मात्र हार्दिक पंड्याच्या ९० आणि शिखर धवनच्या ७४ धावांच्या खेळीनंतरही भारतीय संघ निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावाच करू शकला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना २९ नोव्हेंबरला तर तिसरा सामना दोन डिसेंबरला होणार आहे.
****
येत्या १ डिसेंबरला मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीत मतदान होणार असून, तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीने बजवावा यासाठी, निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी मतपत्रिकेसोबत पुरवलेल्या जांभळया रंगाचा स्केच पेनचाच वापर करावा, पहिला पसंतीक्रम देण्यासाठी आपण निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या रकान्यात "१" हा अंक लिहावा, उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर आपल्या पसंती क्रमानुसार २, ३, ४, इत्यादी अंक लिहिणं ऐच्छिक असल्याचं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मतपत्रिकेवर इतर काहीही लिहू नये किंवा खुणा करू नयेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
****
वाशिमचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधाच्या त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याचा रद्द केलेला गाळप परवाना त्वरीत देण्यात यावा या मागणीसाठी गंगाखेड, पालम तसंच पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल पालम तसंच गंगाखेड इथल्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बाळासाहेब दौडतले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज गंगाखेड तसंच पालम इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारनं मागणी मान्य न केल्यास, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
****
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून र��्बी हंगामासाठी विसर्ग करण्यात येत आहे. त्या विसर्गात आज सकाळी वाढ करण्यात आली, सध्या कालव्यातून १६०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचं पाटबंधारे विभागाने कळवलं आहे.
****
0 notes