Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काही अपवाद वगळता मतदान सुरळीत
राज्यातल्या अकरा मतदार संघांमध्ये ६१ पूर्णांक ४४ टक्के मतदानाची नोंद
सोलापुरात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न तर लातुरात सुनेगाव सांगवी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग-राजकीय नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
आणि
ईव्हीएम हॅक करून देण्याचं आमीष दाखवणाऱ्या सैनिकाला छत्रपती संभाजीनगर इथं अटक
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काल काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. देशभरात दहा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९३ लोकसभा मतदारसंघात, एकूण एक हजार ३३१ उमेदवार या टप्प्यात रिंगणात होते. राज्यातल्या ११ मतदार संघातल्या २५८ उमेदवारांचं राजकीय भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं.
या मतदार संघांमध्ये काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६१ पूर्णांक ४४ टक्के मतदानाची नोंद झाली. यात उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात ६० पूर्णांक ९१, लातूरमध्ये ६० पूर्णांक १८ टक्के, रायगड ५८ पूर्णांक १०, बारामती ५६ पूर्णांक शून्य सात, सोलापूर ५७ पूर्णांक ६१, माढा ६२ पूर्णांक १७, सांगली ६० पूर्णांक ९५, सातारा ६३ पूर्णांक शून्य पाच, कोल्हापूर ७० पूर्णांक ३५, हातकणंगले ६८ पूर्णांक शून्य सात, तर रत्नागिरी -सिंधुदूर्ग मतदारसंघात ५९ पूर्णांक २३ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात बागलवाडी इथल्या मतदान केंद्र क्रमांक ८६ इथं एका मतदारानं मतदान करत असताना ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला होता. मात्र निवडणूक विभागानं त्या ठिकाणी तातडीनं नवीन यंत्र दिल्यानं मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघात जळकोट तालुक्यातल्या डोंगरकोनाळी इथं जिल्हा परिषदेत शाळेत मतदान यंत्रात बिघाडामुळे, तीन तास उशीराने म्हणजे १० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. तर जळकोट शहरात गुरुदत्त विद्यालयातल्या मतदान केंद्रातही मतदान यंत्रातल्या बिघाडामुळे एक तास उशिराने मतदान सुरु झालं. अहमदपूर तालुक्यातल्या सुनेगाव सांगवी ग्रामस्थांनी आपल्या गावाला लातूर-नांदेड हायवेवर जवळचा रस्ता मिळावा म्हणून म���दानावर बहिष्कार टाकला. गावातल्या ४७७ पैकी एकाही मतदाराने मतदान केलं नाही.
ज्या ठिकाणी मतदान यंत्रातल्या बिघाडामुळे मतदान उशिरा सुरु झालं, त्या ठिकाणी जेवढे मतदार सायंकाळी सहा पर्यंत मतदान केंद्र परिसरात आले, त्यांचं मतदान करून घेण्यात आल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
****
उस्मानाबाद मतदारसंघात दहा गावांमधल्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता, मात्र या गावांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी बहिष्कार मागे घेतला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली. तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या एका केंद्रावर मतदान यंत्रात दोषामुळे मतदान २० मिनिटं उशीरा सुरू झालं. तर धाराशिव शहरात भीम नगर भागातल्या मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन पंधरा ते वीस मिनिटं बंद पडल्यामुळे मतदान थांबवण्यात आलं होतं.
दरम्यान, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात नव मतदारांचा उत्साह दिसून आला. पहिल्यांदा मतदान करुन आनंद होत असल्याची भावन या मतदारांनी व्यक्त केली, तसंच मतदान करण्याचं आवाहन केलं.
‘‘नमस्कार, माझं नाव समर सतीश साळुंके. मी धाराशिव जिल्ह्यातील वडगांव सिद्धेश्वर या गावातला रहिवासी आहे. मला १८ वर्ष पूर्ण झाले आणि प्रथम मतदान आलेलं आहे, आनंदही होत आहे, आपण पण मतदान करून आपला अधिकार बजावावा ही विनंती.’’
‘‘माझं नाव हेमंत नितिन पाटील, मी यावेळेस पहिल्यांदा मतदान केलं आहे, आणि मी सगळ्यांना आवाहन करीन तुम्ही सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा.’’
‘‘माझं नाव वैष्णवी जगदीश शिंदे, प्रथम मतदान केले आहे, नव मतदारांनो मी मतदान केलं आहे, तुम्हीही करा.’’
‘‘नमस्कार, मी निशा बालाजी श्रीखंडे, राहणार धारशिव. माझं हे पहिलं मत होतं. आपल्या यंगस्टरसाठी हे फार जास्त गरजेचं वाटतं मला आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने वोट केलंच पाहिजे.’’
****
मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक मतदान केंद्रांवर विविध कल्पना राबवण्यात आल्या होत्या.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या लोदगा या गावात एक मतदान केंद्र बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंनी सजवण्यात आलं होतं, याठिकाणी मतदारांसाठी सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला होता. तर लातूर शहरात पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन इथल्या मतदान केंद्रावर मतदारांना रोपट्यांचं वाटप करण्यात आलं.
रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातल्या वडगाव इथं पाच वाड्यातल्या आदिवासी महिला आणि पुरुष मतदारांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून काल पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल महाराष्ट्रात दोन सभा झाल्या. अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मोदी यांनी, अहमदनगर इथं सभेला संबोधित केलं. ही निवडणूक तुष्टीकरण विरुद्ध संतुष्टीकरण अशी होत असल्याचं, त्यांनी नमूद केलं. मुस्लिमांना आरक्षण देण्याचं आश्वासन विरोधकांकडून दिलं जात असून, देशाचं संविधान मात्र, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला परवानगी देत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. अशी आश्वासनं देऊन, विरोधकच संविधान बदलण्याचं घातक कारस्थान करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला.
दरम्यान, बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी, पंतप्रधानांनी काल अंबाजोगाई इथं प्रचारसभा घेतली. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. कर्नाटकात काँग्रेस सरकारने इतर मागास प्रवर्ग -ओबीसीतून मुस्लिमांना आरक्षण दिल्याच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसनं मराठवाड्याच्या दुष्काळाचा प्रश्न सोडवला नसल्याचं सांगत, महायुतीच्या काळात होत असलेल्या सिंचनाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. देशाच्या नवीन पिढीचं भविष्य चांगलं करण्यासाठी आपण कार्यरत असून जनता हीच आपलं कुटूंब असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
**
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भुसावळ इथं सभा घेतली.
**
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. ही निवडणूक देशाच्या विकासासाठी, देशाचा नेता निवडीची असल्याचं त्यांनी नमूद केलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला, त्याच काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याच्या मुद्यावरून शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल धुळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
औरंगाबाद लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची, काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तसंच वैजापूर इथं सभा झाली. खैरे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या दहा तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे.
एमआयएम पक्षाचे औरंगाबाद लोकसभा उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी यांनी काल छत्रपती संभाजीनगरात स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
****
इलेक्ट्रिक मतदान यंत्र - ईव्हीएम हॅक करुन उमेदवार निवडून देण्याचा दावा करणार्या एका लष्करातल्या सैनिकाला छत्रपती संभाजीनगर इथल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल अटक केली. मारुती ढाकणे असं या सैनिकाचं नाव असून, त्याने विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना वारंवार संपर्क साधून अडीच कोटी रुपयांत ईव्हीएम हॅक करून देण्याचं आमिष दाखवलं. यासंदर्भात दानवे यांच्या तक्रारीवरून, ढाकणे याला सापळा रचून पकडण्यात आलं. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
‘‘प्राथमिक माहितीनुसार त्याचं बी.ए. शिक्षण झालेलं आहे, तंत्रज्ञान किंवा विज्ञानाशी त्याचा काही संबंध नाहीये. सखोलमध्ये पोलीस विभाग चौकशी करत आहे. पण या घडलेल्या घटनेशी आणि ईव्हीएमचा कुठलाही अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीये. संपूर्ण ईव्हीएम हे अतिशय सुरक्षितपणे उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या उपस्थितीमध्ये तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही अफवेला कुणी बळी पडू नये.’’
****
मतदार यादीत पन्नास टक्के महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग, तसंच वैद्यकीय क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
****
हवामान
विदर्भात काल नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया तसंच भंडारा जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. येत्या पाच दिवसात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल डेल्ही कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव केला. या स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात हैदराबाद इथं सामना खेळवला जाणार आहे.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशात सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २७ तारखेला संपत असून, २८ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून, इथल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं केली आहे. या जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल कर��� आहेत. त्याआधी संविधान चौकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच नागपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तर भाजपाकडून ज्येष्ठ नेते नितीन गडकरी उद्या अर्ज दाखल करतील.
****
पंजाबमध्ये भाजपने कोणत्याही पक्षासोबत युती केली नसून, स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनिल जाखड यांनी आज ही घोषणा केली.
उत्तर प्रदेशात या निवडणुकीत राष्ट्रीय लोक दल भाजपसोबत आहे, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. बहुजन समाज पार्टीनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये, गया, नवादा, औरंगाबाद आणि जमुई लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेला वेग आला आहे.
****
भाजप उमेदवार कंगना राणावत यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात, राष्ट्रीय महिला आयोगानं निवडणूक आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. असभ्य आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत आणि एच एस अहिर यांच्या वर्तनाची दखल घेऊन, त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.
दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांच्या आक्षेपार्ह मजकूरावर भाजपकडून तीव्र टीका करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कठोर कारवाई करावी, असं भाजपच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला, यांनीही ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांनी संबंधित वक्तव्य काढून टाकलं आहे. आपलं अकाऊंट हॅक झालं असून, यासंदर्भात तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आज जिल्ह्यातल्या सर्व दोन हजार सहाशे नव्याण्णव मतदान केंद्रावर ‘चुनाव की पाठशाला’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रेच्या तयारीला सुरूवात झाली आहे. त्यासाठी यात्रेकरूंना आवश्यक परवानगी देणाऱ्या आरोग्य प्रमाणपत्रांची व्यवस्था जम्मू विभागातल्या दहा जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. या क्षेत्रातल्या ११२ डॉक्टरांना, आरोग्य केंद्रांमधून आरोग्य प्रमाणपत्रं देण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात यात्रेकरुंच्या नोंदणीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात येत्या चार एप्रिलला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या काल कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा महामार्ग शेतकरी, शेती, पर्यावरण आणि समाज उध्वस्त करणारा असल्याचा आरोप या समितीनं केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष हिरालाल परदेशी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं, बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं.
****
मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. फ्लोरिडा मध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात या जोडीनं ह्यूगो निस आणि जॅन झीलिन्स्की या पोलिश जोडीचा सात - पाच, सात - सहा असा पराभव केला. बोपण्णा - एब्डेन जोडीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज सेम व्हर्बीक आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या डच-ऑस्ट्रेलियन जोडीशी होणार आहे.
****
कन्याकुमारी इथं झालेल्या २०व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला. मुंबईच्या विद्यानिधी मराठी माध्यमिक शाळेनं या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.
****
0 notes