Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
· कृषीविषयक तीन विधेयकांच्या विरोधात शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा.
· मराठवाड्याच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
· राज्यात पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा विचार.
· राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय.
· जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि बीडचे पोलिस अधीक्षक बदलले, पन्नासहून अधिक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या.
· राज्यात आणखी २४ हजार ६१९ कोविड बाधितांची नोंद, ३९८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात ४२ बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ७३१ रुग्णांची नोंद.
आणि
· पैठणचं नाथसागर धरण शंभर टक्के भरलं, नदीपात्रातला विसर्ग वाढवला, गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा.
****
कृषीविषयक तीन विधेयक संसदेत मांडल्यानंतर त्यांना विरोध करत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. शेतकरीविरोधी वटहुकूम आणि या विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी ट्वीटद्वारे केली. हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याआधी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी लोकसभेत कृषीविषयक विधेयकांना विरोध केला. ही विधेयकं पंजाबमधलं कृषी क्षेत्र नष्ट करतील, असा दावा त्यांनी केला. कृषीक्षेत्र ‘खुले’ करणारी शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक, शेतकरी हक्क आणि सुरक्षा किंमत हमी आणि कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. कौर यांच्या राजीमान्यानंतर यातली दोन विधेयकं काल लोकसभेत आवाजी मतदानानं पारित झाली.
****
मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून मुंबई - पुण्याच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण काल पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं, या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातले प्रलंबित विकास प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येतील आणि हा विभाग दुष्काळ मुक्त करण्यात येईल, असं ते म्हणाले. मराठवाडा ही संतांची भूमी असून, अन्याय मोडून काढण्याची क्षमता या भागात असल्याचं, तसंच समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा समृद्ध होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. सध्या मराठवाड्यातल्या जनतेनं कोरोना विषाणू मुक्तीच्या लढ्यात सामील होऊन मराठवाडा या विषाणू संसर्गातून मुक्त करावा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ.प्रविण वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. दौलताबाद इथं देवगिरी किल्ल्यावर नायब तहसिलदार रतनसिंग साळोख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
हिंगोलीत पालकमंत्री वर्षा गायकवाड, नांदेडमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण, बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे, उस्मानाबादमध्ये पालकमंत्री शंकरराव गडाख, जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे, परभणीत पालकमंत्री नवाब मलिक आणि लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ���६व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळानं पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे. गेल्या २० ऑगस्टपासून राज्यात सामाजिक अंतर राखून क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात आली होती. गुजरात आणि कर्नाटक राज्यात शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरु केल्याच्या धर्तीवर राज्यातही महामंडळाच्या बसेसद्वारे पूर्ण आसन क्षमतेनं वाहतूक सुरु करायला महाव्यवस्थापक वाहतूक यांनी मंजुरी दिली आहे. प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं, तसंच बसेस पूर्णपणे निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल सांगितलं. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड19 च्या संदर्भानं काहीही उल्लेख नसेल असं सामंत म्हणाले.
****
राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीत मराठा समाजातल्या तरुणांना न्याय दिला जाईल, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. कायदेशीर बाबी तपासून पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल, असं त्यांनी सामाजिक माध्यमाद्वारे सांगितलं. मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पूर्ण प्रयत्न करेल, असं ते म्हणाले.
न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं भरतीची घोषणा केली, त्यामुळे पोलिस भरतीत मराठा तरूणांची संधी हुकणार आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या १३ टक्के जागा बाजूला ठेवून इतर पदांसाठी पोलीस भरती करण्याची मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांच्यासह अन्य मराठा नेत्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देशमुख यांनी ही माहिती दिली.
राज्य सरकारनं जाहीर केलेली भरती स्थगित करावी अशी मागणी सातारा इथले भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही मात्र दलित, आदिवासी आणि इतर मागास वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी सर्वच पक्षांची भूमिका असल्याचं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू असताना केंद्र शासनानं देखील वकील नियुक्त करणं आवश्यक होतं, कारण केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण वाढवलं असल्याचं भुजबळ म्हणाले.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणावर दिलेल्या स्थगिती निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून आरक्षणासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं.
****
औरंगाबाद इथं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षणा संदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधी घोषणा देत आरक्षण स्थगिती रद्द करण्याची मागणी केली.
नांदेड इथंही मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
****
राज्यात काल पन्नासहून अधिक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या रात्री उशिरा बदल्या करण्यात आल्या. यामध्ये मराठवाड्यातल्या सहा पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था महासंचालक कार्यालयाचे सहायक पोलीस महानिरीक्षक विनायक देशमुख यांची जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणून, राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त राजा रामस्वामी यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून, ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षकपदी, नागपूरच्या राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक निखिल पिंगळे यांची लातूरचे पोलीस अधीक्षक पदी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तांत्रिक सेवा अधीक्षक राकेश कलासागर यांची हिंगोलीच्या पोलीस अधिक्षकपदी बदली झाली आहे. तर परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी जयंत मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी २४ हजार ६१९ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या ११ लाख ४५ हजार ८४० झाली आहे. काल ३९८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३१ हजार ३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत आठ लाख १२ हजार ३५४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख एक हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ७३१ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ३२० रुग्ण आढळून आले. बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात ३०३, तर नांदेड जिल्ह्यात नव्या २६४ रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ९७ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ३६० रुग्णांची भर पडली. परभणी जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ७८ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी २६८ रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात ४१ रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे जिल्ह्यात आणखी चार हजार ५७१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ८५ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत दोन हजार ३८९ नवे रुग्ण आणि ४३ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात एक हजार ७१७, सांगली एक हजार २८, जळगाव ९४८, सातारा ७९०, सोलापूर ६३१, पालघर ३४८, यवतमाळ १७२, सिंधुदुर्ग १६६, धुळे ९२, वाशिम ६६, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी ५९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूची लक्षणं दिसून न येणाऱ्या बाधित रुग्णांना सुविधा असेल तर घरातच ठेवावं, यामुळे यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असं पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या कोविड १९ आढावा बैठकीत ते काल बोलत होते. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून यशस्वी करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
मराठवाड्यात कालही अनेक ठिकाणी पाऊस झाला. औरंगाबाद शहरात रात्री काही वेळ विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यात औराद शहाजनी इथं ढगफुटी झाली. दीड तासात १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम आणि उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. भूम इथं वीज पडून एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठणचं नाथसागर धरण शंभर टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणातून काल रात्री विसर्ग वाढवत ७५ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातलं लिंबोटी धरण ९७ टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणातून मन्याड नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
नांदेड शहराजवळच्या डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या दोन दरवाजांपैकी एक दरवाजा काल बंद करण्यात आला असून, धरणातून सध्या एका दरवाजातून १३ हजार ९४९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल नवी दिल्लीत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विजय यादव यांची भेट घेऊन रेल्वेच्या पायाभूत सुविधा, मराठवाड्यातली रेल्वे सेवा आणि संबंधित दीर्घ प्रलंबित प्रकल्पांबाबत चर्चा केली. औरंगाबाद शहरातल्या शिवाजीनगर इथल्या रेल्वे उड्डाण पुलाची प्रलंबित मागणी संदर्भातलं सर्वेक्षण राज्य सरकार आणि रेल्वे विभागानं संयुक्तपणे केलं असून, रेल्वे मंडळाकडे अंतिम मंजुरी प्रलंबित होती. यादव यांनी आठवडाभरात याला मंजुरी देण्याचं आश्र्वासन दिल्याचं, जलील यांनी कळवलं आहे.
दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादमध्ये ध्वजारोहणास उपस्थित न राहिल्याबद्दल आपल्यावर टीका केली जात असली, तरी आपण दिल्लीत मराठवाड्याच्या खऱ्या विकासासाठी काम करत आहोत, असंही खासदार जलील यांनी म्हटलं आहे.
****
शिक्षण मिळणं हा प्रत्येक बालकाचा अधिकार असून, विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार शिक्षणाबरोबरच जीवनामध्ये उपयोगी पडणारं ज्ञान देण्याचं कार्यही शिक्षकांनी करावं, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. जालना इथं शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर साजरा होत असलेल्या सेवा सप्ताहाअंतर्गत उस्मानाबाद इथं काल भाजपच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण करण्यात आलं.
याअंतर्गत भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड आणि समाज कल्याण विभागाचे माजी सभापती संजय दोरवे यांच्या हस्ते ग्रामीण मतदार संघातल्या ३० आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या होनगाव इथल्या आरोग्य प्राथमिक केंद्रात भाजपच्या वतीनं फळ वाटप करण्यात आलं.
****
हिंगोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर प्रयोगशाळेला पालकमंत्री वर्षा गायकव��ड यांनी भेट दिली. या प्रयोगशाळेमुळे काही वेळातच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं निदान होण्यास मदत होईल.
****
हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्यकारणी सदस्य खंडेराव सरनाईक यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ परिषदेवर मराठवाडा विभागातून एकमताने निवड झाली. या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्याला राज्य स्तरावर ग्रंथालय चळवळीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
****
कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध नाशिक जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनं करण्यात आली.
निफाड तालुक्यात विंचूर इथं नाशिक-औरंगाबाद मार्गावर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जे खासदार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार नाहीत किंवा आंदोलन करणार नाहीत, त्यांच्या घरासमोर येत्या २३ तारखेपासून रयत क्रांती संघटना निदर्शनं करेल, असा इशारा खोत यांनी दिला.
****
0 notes