Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही; हिंदुत्त्व, महागाई आणि काश्मीरसह अनेक मुद्यांवरून भाजपवर टीका
· विधान परिषद निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर
· राज्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन हजार ७०१ नवे रुग्ण
· राज्याचा बारावीचा निकाल ९४ पूर्णांक २२ शतांश टक्के; मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक
· बीड इथं गर्भपातादरम्यान मृत्यू प्रकरणी चौघांना अटक
· मराठवाड्यात हिंगोली, बीड तसंच उस्मानाबाद परिसरात पूर्वमोसमी पाऊस
आणि
· क्रिकेटपटू मिताली राज हिची क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्तीची घोषणा
****
औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्वाभिमान सभेत बोलत होते. समांतर जलवाहिनीसोबतच औरंगाबादच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेसाठीही निधी देत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. निधी देऊनही कंत्राटदार काम करत नसेल, तर त्याला थेट तुरुंगात टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले...
बाईट –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करणार असल्याचा, पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र हे नामांतर करण्यापूर्वी हे शहर संभाजी महाराजांच्या नावाला साजेसं करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. ते म्हणाले..
बाईट –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी, भाजपने आजपर्यंत हिंदुत्त्वासाठी काय केलं, असा प्रश्न विचारला. भाजप फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्वाचा वापर करत असल्याची टीका त्यांनी केली. पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांसाठी, असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला
भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जगभरात भारताची नाचक्की झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. वाढती महागाई, काश्मिरी पंडितांच्या हत्या, यासह केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीवरही त्यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाली, हे सरकार पडत नसल्यामुळे भाजप अस्वस्थ असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्त्व असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव पूर्ववत धाराशिव करावं या मागणीचं, १० हजार जणांच्या स्वाक्षरीचं निवेदन हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीनं काल औरंगाबाद इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत देण्यात आलं.
****
विधान परिषद निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार काल जाहीर केले.
भारतीय जनता पक्षानं पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना संधी देण्यात आली नाही. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, मात्र केंद्राने काहीतरी भविष्यातला विचार केला असेल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
काँग्रेसनं विधान परिषद निवडणुकीसाठी चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून सचिन आहिर आणि शिवसेनेचे नंदूरबार जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे.
****
सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतल्या चारही महामंडळांच्या भागभांडवल वाढीचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यासंदर्भातला निर्णय गेल्या अट्ठावीस एप्रिलला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. यानुसार, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ तसंच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, या तीन महामंडळांचं भागभांडवल प्रत्येकी एक हजार कोटी, तर राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचं भागभांडवल पाचशे कोटीं रुपये करण्यात आलं आहे.
****
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अमित देशमुख यांच्यात युक्रेनमधल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी दुरस्थ शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना पवार यांनी यावेळी दिली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन हजार ७०१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ९८ हजार ८१५ झाली आहे. राज्यात काल या संसर्गानं कोणाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८६६ झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल एक हजार ३२७ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ४१ हजार १४३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९ हजार ८०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे चार रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात दोन, लातूर तीन, तर नांदेड जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला.
****
२०२२-२३ च्या खरीप हंगामासाठी १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. प्रत्येक पिकासाठी ही किंमत उत्पादन खर्चाच्या दीडपट असण्याची काळजी सरकारनं घेतली असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. मूग डाळीच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल चारशे ऐंशी रुपये, सूर्यफूल बियांसाठी तीनशे पंच्याऐंशी रुपये, तिळासाठी पाचशे तेवीस रुपये, तर तूर डाळीसाठी प्रति क्विंटल तीनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. धानाच्या किमान आधारभूत किमतीत शंभर रुपयांची वाढ करून ती आता दोन हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल इतकी करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९४ पूर्णांक २२ टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७ पूर्णांक २२ टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९० पूर्णांक ९१ टक्के इतका लागला आहे.
औरंगाबाद विभागाचा निकाल ९४ पूर्णांक ९७ टक्के, लातूर ९५ पूर्णांक २५ टक्के, अमरावती आणि नागपूर विभागाचा सरासरी ९६ टक्के, कोल्हापूर ९५ पूर्णांक सात टक्के, नाशिक ९५ पूर्णांक तीन टक्के, तर पुणे विभागाचा निकाल ९३ पूर्णांक ६१ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून, सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल ९५ पूर्णांक ३५ टक्के, तर मुलांचा निकाल ९३ पूर्णांक २९ टक्के लागला आहे.
बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे, तसंच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना यशानं यावेळेस हुलकावणी दिली असली तरी त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमानं तयारी करून पुढच्या वेळेस यश मिळवावं, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
****
बीड जिल्ह्यात सीता गाडे गर्भपात आणि मृत्यू प्रकरणी पाच जणांविरोधात पिंपळनेर पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मयत महिलेचा पती, सासरा, भाऊ यांच्यासह अंगणवाडी सेविका, आणि परिचारिकेचा समावेश आहे. यातील चौघांना काल अटक करण्यात आली असून, गर्भपात करणाऱ्या परिचारिकेचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. या प्रकरणातली गर्भलिंग निदान करणारी व्यक्ती मात्र अद्याप आढळून आली नसल्याचं पोलिसांनी सांगितल.
दरम्यान बीड जिल्ह्यात गर्भलिंग निदान होत असल्याचं आढळल्यानं जिल्हा प्रशासनानं आरोग्य विभागाला पुन्हा धाडसत्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
****
मराठवाड्यात काल हिंगोली, बीड तसंच उस्मानाबाद परिसरात पूर्वमोसमी पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात काल सोसाट्याच्या वाऱ्यासह प्रचंड मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाउस झाला. गिरगाव शिवारात केळीचं मोठं नुकसान झालं तर कुरुंदा इथे वीज कोसळून एक बैल दगावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड शहरासह जिल्ह्यातही काल चांगला पाऊस झाला. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस शहरात पहाटेपर्यंत सुरू होता. अंबाजोगाई शहर आणि परिसरातही काल रात्री सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला, मात्र हवेत गारवा निर्माण झाला.
उस्मानाबाद शहर आणि परिसरातही काल पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच टी ट्वेटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून दिल्लीत सुरवात होत आहे. कर्णधार के एल राहुल आणि उपकर्णधार कुलदीप यादव हे दोघं जखमी असल्यानं, या मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता पहिल्या सामन्याला सुरवात होईल.
****
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये मिताली टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त झाली होती. मिताली ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारी खेळाडू आहे. भारताची जर्सी घालून खेळणं आणि भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणं हा आपल्यासाठी एक सन्मान होता, अशा भावना मितालीनं व्यक्त केल्या.
****
हरियाणा इथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं काल २ सुवर्ण, ३ रौप्य तर ५ कांस्य पदकं पटकावली. कुस्ती, अॅथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलिफ्टिंगमधील पदकांचा यात समावेश आहे. काल ट्रीपल जंप प्रकारात पूर्वा सावंतनं तर ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलनं सुवर्णपदक मिळवलं. कुस्तीत आणि मल्लखांब मध्ये सांघिक मुला-मुलींच्या संघांनी काल सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावलं. हरियाणानं दोन्ही प्रकारात विजेतेपद पटकावलं. तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर राहिली.
****
देशातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवी संघटना निर्माण केली असल्याची माहिती, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. ते काल राळेगणसिद्धी इथं पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय लोक आंदोलन या संघटनेची अधिकृत घोषणा आपल्या जन्मदिनी, एकोणीस जूनला दिल्लीत करणार असल्याचं, तसंच कार्यकर्त्यांना एक दिवसाचं प्रशिक्षण देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारनं ऑगस्टपर्यंत लोकायुक्त कायदा आणला नाही तर पूर्ण राज्यभर यासाठी आंदोलन छेडू, असा इशारा हजारे यांनी दिला.
****
उस्मानाबाद जिल्हयात जून आणि जुलै महिन्यात हर घर दस्तक मोहिमेचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती करुन प्रत्येक घरांपर्यंत पोहोचून कोविड लसीकरणापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थींचा शोध घेतला जाईल, त्यांची CoWIN अॅपच्या माध्यमातून नोंदणी करुन त्याच ठिकाणी त्यांना कोविड लसीची मात्रा देण्यात येणार आहे.
****
ग��रामीण भागातल्या स्वयंसहाय्यता समूहातल्या महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी उमेद अभियानामार्फत सुरू असलेल्या राज्यस्तरीय लघुपट आणि माहितीपट स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातल्या स्पर्धकांनी भाग घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अभियान संचालक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. स्पर्धकांनी त्यांच्या यशोगाथा सात मिनिटांपर्यंतच्या फितीत चित्रित करून या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर येत्या पंधरा जूनपर्यंत सादर करायच्या आहेत.
****
औरंगाबाद ते जालना रेल्वे मार्गावर करमाड ते बदनापूर रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाण पुलाचं काम सुरु असल्यानं पाच दिवस लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. ११, १३, १५, १८ आणि २० जून रोजी दुपारी सव्वा तीन ते सव्वा सहा दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे पाच दिवस औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस संध्याकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. तर काचीगुडा ते रोटेगाव ही गाडी परभणी ते जालना दरम्यान ९० मिनिटे उशीरा धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०३ मार्च २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. अर्थमंत्री अजित पवार येत्या ११ तारखेला २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
युक्रेनहून भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन गंगा मोहीमेअंतर्गत बुखारेस्टहून आज मुंबईत एक विमान दाखल झालं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्व प्रवाशांचं स्वागत केलं. युक्रेनमध्ये सुमारे १७ हजार भारतीय अडकले असून, त्यापैकी सुमारे चार ते पाच हजार भारतीयांना परत आणलं आहे; उर्वरित सर्वांना मायदेशी आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचं दानवे यावेळी म्हणाले. युक्रेनहून परतलेल्या भारतीयांना त्यांच्या मूळगावी जाण्याची सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेनं मुंबई विमानतळावर एक मदत कक्ष स्थापन केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात काल रात्री दूरध्वनीवरून पुन्हा एकदा चर्चा केली. संघर्षग्रस्त भागांमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं.
****
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दहा जिल्ह्यांमधल्या ५७ मतदार संघात हे मतदान होत असून, ६६ महिला उमेदवारांसह ६७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातला शेतमाल उत्तर भारतात पोहोचवणारी किसान रेल्वे आता लासलगाव इथून आठवड्यातून तीन ऐवजी चार दिवस धावणार आहे. त्यामुळे शेतमालाबरोबरच कांद्याची वाहतूकही होणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी चार दिवस रेल्वेतून शेतमाल पाठवता यावा यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
****
मराठवाड्यात काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात दहा, नांदेड तीन, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली. लातूर, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
0 notes